सामाजिक
खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मिळण्याबाबत रासपची तहसीलदारांकडे मागणी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मिळण्याबाबत अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार विकास पवार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे, संतोष सोलंकर, सतीश बिराजदार, दत्ताराम भांगे, बाबू शिकलगार, गणेश कांदे शिवा जमगे, प्रसाद मुकडे, साईनाथ फुलारे, शिवाजी खांडेकर, रवी बजंञी आदी उपस्थित होते.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाचा निर्णय झाला आहे. परंतु यामध्ये अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी सातबारा उताऱ्यावर आहे त्यांनाच हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ई पीक पाहणी केली आहे परंतु काही कारणास्तव ऑनलाईन झाले नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. तरी शासनाने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.