महाराष्ट्र

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार!

जगात युद्धाचे ढग, भारतात मात्र शांतता

पिंपरी (प्रतिनिधी)  :- जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्तेची हानी होत असल्याने जागतिक शांततेसाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने संत तुकाराम नगर येथे ८ मार्च रोजी रॅली काढण्यात येणार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी म्हटले आहे की, आखाती युद्धामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण जगात अस्थिरता आणि भीतीचे सावट पसरले असून याचे दूरगामी परिणाम आर्थिक आणि सामाजिक स्तरावर जाणवू लागले आहेत.इराणला सुमारे २४ ते ३५ बिलियन डॉलरपर्यंत म्हणजे २ लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, तर इस्रायलचेही २० हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.अमेरिकेलाही अब्जावधींचा फटका बसला असून हजारो निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले आहेत.लाखो नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे भारतातील नागरिक सुखा समाधानाने नांदत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.

आखाती देशांमधून जगभर पेट्रोलियम कच्च्या मालाचा पुरवठा होत असल्याने हा संघर्ष अधिक काळ चालल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील.इंधन दरवाढ, महागाई आणि बेरोजगारी याचा सर्वाधिक फटका समाजातील सर्व घटकांना व कष्टकरी वर्गाला बसणार आहे.२१व्या शतकात जग प्रगतीपथावर असताना युद्धामुळे पुढील २५ वर्षांची प्रगती मागे जाईल. त्यामुळे भारतासह सर्व प्रमुख राष्ट्रांनी पुढाकार घेऊन तातडीने शांतता प्रस्थापित करावी असे आवाहन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने रविवार, दि. ०८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संत तुकारामनगर येथे जागतिक शांततेसाठी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत युद्धात प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button