टॉप न्यूज
अक्कलकोट नगरपालिका फेरीवाला धोरण राबविणार कधी ?

अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे छोटे व्यापारी मेताकुटीला !
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट नगरपालिकेकडून शहरातील प्रमुख चौकातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदरची मोहीम ही हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यापारी वर्गाचे संसार उध्वस्त करणारी असल्याची भावना छोट्या व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी फेरीवाला धोरण राबवून छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दर मंगळवारी शहरातील एका भागातील अतिक्रमण काढण्याची घोषणा केली आहे. मुख्याधिकारी डाके यांच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेचा धसका शहरातील छोट्या व्यापारी वर्गाने घेतला आहे.रस्त्याला अडथळा करणारी अतिक्रमण काढणे गरजेचे आहे .जर वाहतुकीस तसेच नागरिकांना त्रासदायक होणारे अतिक्रमण काढणे नगरपालिका प्रशासनाचे कामच आहे. पण ज्या भागात अडथळा नाही त्या ठिकाणची छोटी दुकाने टपऱ्या काढू नये अशा भावना शहरातील छोट्या व्यापारी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत. अक्कलकोट शहरात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून अनेक लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन हे रस्त्याच्या बाजूची छोटी भजी, वडापाव, पान, चहाच्या टपऱ्या याच आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शहरात भजीपाव ,वडापाव, चहाच्या टपऱ्या या मोठ्या प्रमाणात आहेत. या छोट्या दुकानांवर टपऱ्यांवर शेकडो लोकांचे संसार चालतात. याचा विचार खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. कारवाईचा वरवंटा फिरविताना समोरच्या माणसाच्या कुटुंबाचा विचारही करणे क्रमप्राप्त आहे .अक्कलकोट शहरात नगरपालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी फेरीवाला धोरण राबवून रस्त्याच्या बाजूला नगरपालिकेमार्फत छोटी दुकाने बेरोजगारांना भाडेपट्ट्याने काढून दिल्यास यामुळे नगरपालिकेचे महसूल ही वाढण्यास मदत होणार आहे. अक्कलकोट शहरात शेकडो टपऱ्या छोटी दुकाने ही चालू आहेत. पण नगरपालिकेने या दुकानांना नाममात्र भाडेपट्टा ठरवून त्यांना व्यापार करण्यास मदत केली तर यात नगरपालिकेचे आणि छोट्या टपरीधारकांचें दोघांचाही फायदा होणार आहे. अक्कलकोट शहरात अनेक ठिकाणी नगरपालिकेची जागा पकडून काही गुंड वृत्तीच्या लोकांनी ती बेरोजगारांना भाडेपट्ट्याने देऊन महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहेत .काही जणांचा हा कायमस्वरूपी व्यवसाय झाला असून वर्षाला शासकीय जागेतून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. याचा मुख्याधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि नगरपालिकेचे महसूल वाढविण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांना ज्या ठिकाणी वाहतुकी अडथळा नाही तिथे छोटे दुकाने काढून भाडेपट्ट्याने देण्याचा विचार करावा. यामुळे शहरातील अनेक जणांनी नगरपालिकेच्या जागेवर खोके ठेवून जो आर्थिक मलिदा मारण्याचा उद्योग सुरू केला आहे यास लगाम बसेल अशा भावना टपरीधारकातून व्यक्त केल्या जात आहेत .नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी फेरीवाला धोरण राबविण्याची मागणी बेरोजगार छोट्या व्यापारी वर्गातून केली जात आहे.
चौकट – नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेबाबत मागिल काळात प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. बदली झालेले मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी अतिक्रमण विरोधी मोहिम हाती घेतली होती. शहरातील श्रीमंत लोकाच्यां जागेच्या बाजूस असणारे नगरपालिका जागेतील गेल्या अनेक वर्षापासूनच्या टपऱ्या छोटी दुकाने काढण्यात आली. या कारवाईला आर्थिक वास असल्याची चर्चा नागरिकातून झाली. नगरपालिका जागेतील अतिक्रमण धारकांनां जर छोटी दुकाने नगरपालिकेकडून काढून देण्यात आली असती तर अनेक लोकानां याचा आधार झाला असता असे बोलले गेले. नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमे बाबतच नागरिकात शंकेचे वातावरण पसरले आहे.
