स्थिर सरकारसाठी सेवाभावी महायुतीला विजयी करा – पंतप्रधान मोदी

सोलापूर -विकासाचे ध्येय असलेले स्थिर सरकारच महाराष्ट्राकरिता दूरगामी नीती राबवू शकते. काँग्रेस आणि त्यांच्या महाआघाडीच्या गाडीला चाके नाहीत, ब्रेक नाहीत, गाडी कोणी चालवायची यासाठी भांडणे सुरू आहेत. निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदासाठी एकमेकांशी भांडणारे अस्थिर लोक स्थिर सरकार देऊ शकत नाहीत, राज्याचा विकास करू शकत नाहीत, त्यामुळे स्वच्छ नीती आणि सेवाभावाचे संस्कार असलेल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला साथ द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथे जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या विशाल जाहीर सभेत बोलताना केले. यावेळी फेटा बांधून, कटी आणि घोंगडी पांघरून पंतप्रधानांचे नरेंद्र मोदींचे सोलापूरच्या स्वागत केले. यावेळी खा. धनंजय महाडिक, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, आणि उमेदवार सुभाष देशमुख, विजय देशमुख, देवेंद्र कोठे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राम सातपुते, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.