अमरसिंग आदियाल यांच्याकडून अरुण पवार यांना धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकी

आदियाल यांच्यावर कारवाई करून संरक्षण देण्याची अरुण पवार यांची मागणी
पोलीस आयुक्त व सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल
पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )येथील सामाजिक कार्यकर्ते, वृक्षमित्र अरुण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार करीत होते. हा राग मनात धरून पिंपळे गुरव येथील अमरसिंग आदियाल यांनी अरुण पवार यांना धक्का-बुक्की करीत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. आदियाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत अरुण पवार यांनी पोलीस आयुक्त व सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अरुण पवार यांनी पोलिस आयुक्त व सांगवी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, अमरसिंग आदियाल हा गुंडप्रवृतीचा आहे. हप्ते वसूल करणे, खंडणी वसूल करणे, बनावट दारू तयार करून विकणे असे अनेक अवैध धंदे हा अमरसिंग आदियाल करत आहे. गेल्या ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. उमेदवार शंकर जगताप यांच्या विरोधात काम केल्याने आणि उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार पिंपळे गुरव भागात करत होतो. ते त्याला आवडत नसल्यामुळे मी त्या भागात राहुल कलाटे यांचे प्रतिनिधित्व करू नये, यासाठी ते वारंवार माझ्याकडे रागान बघत होते किंवा माझ्या कानावर अश्या चर्चा होत्या, की ते मला मारहाण देखील करणार आहेत.
मतदानादिवशी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ०८ वाजता अमरसिंग आदियाल यांनी किलबिल शाळेच्या बाजूला मी थांबलेलो असताना समोरून येऊन धक्का- बुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. “चल येथून निघून जा, नाहीतर नदी जवळ आहे, तुकडे-तुकडे करून नदीत फेकून देईन, माझ्या नादाला अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरात कुणी लागत नाही, मी ५० बाहेरून गुंड आणून माझ्या मंगल कार्यालयात मुक्कामी आणून ठेवली आहेत, तुला व तुझ्या कुटुंबीयांसह सर्वांना संपवून टाकेन,” अशी धमकी दिली. त्यामुळे आदियाल याच्यावर कायदेशीर कारवाई करून माझे व माझ्या कुटुंबीयाचे संरक्षण करावे. माझ्या जिवास धोका आहे. उद्या माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास पोलिस प्रशासन जबाबदार राहील, अशी मागणी अरुण पवार यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
मी गेली २० वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत : अरुण पवार
पिंपरी चिंचवड शहरात मी गेल्या २० वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे. तसेच विश्वासू बांधकाम व्यावसायिक आहे. आत्तापर्यंत ५० हजार झाडे स्वखर्चातून लावून संवर्धन केले आहे. अनाथ मुलांना मदत, कचरा वेचणाऱ्या ५०० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, सतत ५ वर्ष मुक्या (माकडांची) प्राण्याची खाद्य व पाणी पुरवठा करून सेवा, दुष्काळी भागात ५०० शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप, सतत ७ वर्ष दिंडीमध्ये देहू ते पंढरपूर ५ टँकरव्दारे पाणी सेवा, दुष्काळामध्ये २०१४ मध्ये २० गावांना सिमेंटचे हौद ठेऊन पाणीपुरवठा, गोशाळेला ५ ट्रकद्वारे चारा, कोरोना काळात पाच हजार कुटुंबीयांना महिनाभर पुरेल इतके धान्य किट वाटप करण्यात आले. आतापर्यंत २००० ज्ञानेश्वरी व २००० एकनाथी भागवत गाथा वाटप करण्यात आली, असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.