सामाजिक

अक्कलकोट तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त ! महागाईमुळे जनता बेजार ! 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. दुसरीकडे प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता बेजार झाल्याचे दिसत आहे. आता पुढील काळात तरी पाऊस पडेल का ही चिंता शेतकरी व नागरिकांना भेडसावत आहे.
 अक्कलकोट तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ६२ % पेरणी करण्यात आली होती. पण जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. जून महिन्यात ८० मिलिमीटर , जुलै महिन्यामध्ये ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .ऑगस्ट महिन्यात ही समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाळ्यातील तीनही महिने कोरडे गेल्याने खरीप हंगामात पेरणी केलेली पिके ही करपून गेली आहेत. अक्कलकोट तालुक्यातील सर्वच भागातील पिकानी माना घातल्या आहेत. पिके सुकू लागली आहेत. पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे .ग्रामीण भागातील तलाव , ओढे , नदी , नाले यामध्ये पाणीसाठा झाला नसल्याने भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पाऊस नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे सर्वसामान्य माणसाला महागाईच्या प्रचंड झळा सोसाव्या लागत आहेत. अन्नधान्याच्या किमती प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य माणसाचे महिन्याचे गणित कोलमडले आहे. साखर ,ज्वारी , गहू , बाजरी, कडधान्य , तांदूळ , खाद्य तेल व इतर संसार उपयोगी साहित्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने सर्वजण बेजार झाले आहेत. वाढत्या महागाईची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शेतकरी पावसामुळे चिंतेत तर सामान्य माणूस महागाईमुळे बेजार अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. शासनाने अन्नधान्याच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी होत आहे. शासनाने  दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यानां आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button