भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे : खासदार प्रणिती शिंदे

नवी दिल्ली -नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत, आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत, पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर, सरपंच संतोष देशमुख हत्या, महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत, यावर सरकार काही करताना दिसत नाही. महाराष्ट्रातील सामाजिक संतुलन नष्ट करण्यासाठी लोकांचे लक्ष हटवण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहेत. या महाराष्ट्रात लोकांना भडकवण्याचा, महाराष्ट्राची परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने करू नये, आज देशात अनेक प्रश्न आहेत त्यावर जनता उत्तर मागत आहे. काल मोदीजी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे महाराजांच्या वेळी मणिपूर सारख्या घटना, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या सारख्या घटना घडल्या नाहीत हे अपमान आहेत.