क्राईम
अक्कलकोटच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट !

मोबाईल चोरीमुळे नागरिकात चिंतेचे वातावरण अक्कलकोट (प्रतिनिधी ) अक्कलकोट शहरात भरणाऱ्या सोमवारच्या आठवडा बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट वाढला असून एकाच दिवशी सहा – सात नागरिकांचे मोबाईल चोरीला गेल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने मोबाईल चोरांचा बंदोबस्त करून त्यांना पकडण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
अक्कलकोट शहरात सोमवारी आठवडा बाजार हा एवन चौका जवळील कांदा बाजार परिसरात भरतो. आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी अबालवृद्ध नागरिकांची तसेच महिला वर्गाची गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोर नागरिकांचे महागडे मोबाईल हातोहात लंपास करत आहेत. दिनांक ७ सप्टेंबर रोजी सहा ते सात नागरिकांचे हजारो रुपये किमतीचे महागडे मोबाईल चोरानी अत्यंत शिताफीने लांबविले आहेत. एकाच दिवशी मोबाईल चोरानी नागरिकांचे मोबाईल चोरत पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे. दिवसाढवळ्या भर बाजारात मोबाईल चोर हे चोरी करून सुरक्षितपणे जात असल्याने नागरिकांतून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महागडे मोबाईल चोरीस गेल्याने अनेक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे .या चोरांवर पोलीस प्रशासन कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बालाजी फुलचंद जाधव ( राहणार विश्वास नगर अक्कलकोट ) यांचा सॅमसंग एस जी कंपनीचा मोबाईल चोरट्यानी भाजी खरेदी करताना चोरला आहे .याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात बालाजी जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. अक्कलकोट शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याने आता पोलीस प्रशासनाने मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



