सोलापूर ( प्रतिनिधी ): महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये लावणे बंधनकारक करण्यात यावे, यासाठी शासन आदेश व राजपत्र काढण्यात यावे, अशी मागणी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ, सोलापूर जिल्हा व शहर यांच्या वतीने करण्यात आली.
या मागणीसंदर्भात संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत ऐतिहासिक व मोलाचे योगदान दिले असून, सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या महान कार्याचा आणि संविधान निर्मितीतील योगदानाचा सन्मान म्हणून शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची प्रतिमा सन्मानपूर्वक लावणे आवश्यक आहे, अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली.
शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने शासन आदेश काढावा व आवश्यक ते राजपत्र प्रसिद्ध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे सोलापूर जिल्हा व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






