दोषींवर कठोर कारवाई करून ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील पद्मावती उद्यानानजीक असलेल्या जलतरण तलावाच्या प्रशासनिक व, सुरक्षाविषयक गलथान कारभारामुळे आतापर्यंत चार तरुणांचा बळी गेल्याचा आरोप करीत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी ह्या मागणीसाठी सोलापूर (ग्रामीण) जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक असे उपोषण करण्यात आले.
जलतरण तलावात यापूर्वी सन २०२४ मध्ये एका तरुणाचा बळी गेल्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी नेमकी कोणत्या पातळीवर झाली? दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली? नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? तसेच, पहिली दुर्घटना घडूनही त्याच ठेकेदाराला पुन्हा जलतरण तलाव चालविण्याची परवानगी कशी देण्यात आली? यांसह अनेक गंभीर प्रश्न आंदोलनकर्त्यांनी याठिकाणी उपस्थित केले.
यावेळी प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेत पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी उपोषणस्थळी भेट देवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०५५० हा दि. २९ ऑगस्ट, २०२४ रोजी दाखल झालेला असल्याची माहिती देण्यात आली. सदरील प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधित दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल तसेच, संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी इथे दिले.
प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण मागे घेतले. मात्र, दोषींवर वेळेत आणि कठोर कारवाई झाली नाही तर, गणेश मूर्ती विसर्जनानंतर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा कारभार काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही. जलतरण तलाव हा नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाण असायला हवा; तो ‘मौत का कुवां’ बनविणाऱ्या निष्काळजी व्यक्तींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हणमंत मोरे, ग्रामीण (पूर्व) जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर, सुहास भाळवणकर, जिल्हा सचिव प्रा.अशोक डोळ, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष मिलिंद आढवळकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप शिंदे, समाजसेवक शिवाजीराजे धोत्रे, सोशल मीडिया विभागाचे पूर्व तालुकाध्यक्ष देवानंद इरकल, शहराध्यक्ष महेश आधटराव, माजी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बाळासाहेब आसबे, सायबू वाघमारे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.






