सोलापूर ( प्रतिनिधी ) : दुर्मिळ सुंद्री वाद्य कला अकादमी, सांस्कृतिक मंत्रालय (भारत सरकार) आणि सह्याद्री दूरदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सोलापुरातील लोकमान्य टिळक सभागृह (ॲम्फी थिएटर) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘संगीत प्रतिभा महोत्सवा’ची सांगता अत्यंत उत्साहात आणि मंतरलेल्या वातावरणात झाली. पंडित भिमण्णा जाधव यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात सुंद्री वादन, शास्त्रीय गायन, व्हायोलिन, भरतनाट्यम, तबला-हार्मोनियमची साथ आणि कथक नृत्याच्या अविष्काराने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
या महोत्सवाचे उद्घाटन महापालिकेच्या साहाय्यक आयुक्त वीणा पवार, माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर, सोलापूर आकाशवाणीचे साहाय्यक संचालक सोमशेखर पाटील, श्रीकांत येळेगावकर, सह्याद्री वाहिनीचे महेंद्र जगताप, गणेश नास्ते व ऋषिकेश नागावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
महोत्सव प्रसंगी सादरीकरणाची सुरुवात जाधव घराण्याच्या पाचव्या पिढीतील बालकलाकार कु. कलाश्री जाधव यांनी ‘राग दुर्गा’ने केली. त्यात मींड, ताना, तिहाई सादर करत त्यांनी ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजनही पेश केले. त्यांना अजय यंगल यांनी तबलासाथ दिली. त्यानंतर सोलापूरच्या रमा कुलकर्णी यांनी ‘राग पुरिया कल्याण’ मधील वादी-संवादी स्वरांची पकड घेत बहारदार हिंदुस्तानी शास्त्रीय गायन केले. त्यांना नितीन दिवाकर यांनी तबला तर राजकुमार सावळगी यांनी हार्मोनियमची साथ दिली.
त्यानंतर जाधव घराण्याचे बालकलाकार मास्टर व्यंकटेशकुमार जाधव आणि लंडनची शिष्यवृत्तीप्राप्त कलाकार कु. वेधा पोळ यांच्यातील सुंद्री व व्हायोलिन जुगलबंदीने रंगत आणली. त्यांनी प्रस्तुत केलेल्या ‘राग यमन’ मधील स्वररचना, तान, गमक आणि सवाल-जबाब यांनी रसिकांची दाद मिळवली. या जुगलबंदीनंतर त्यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग सादर केला. त्यांना पुण्याच्या वेदांग जोशी यांनी तबल्याची साथसंगत केली.
कोलकत्त्याच्या जगप्रसिद्ध ठुमरी गायिका पं. रोजी दत्ता यांनी उपशास्त्रीय संगीतात दोन ठुमरी व दादरा सादर करून प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांना जोथम कराळ यांनी तबला तर ओंकार पाठक यांनी संवादिनीची साथ दिली.
नृत्यविभागात एकता कांबळे यांनी सादर केलेल्या भरतनाट्यममधील अप्रतिम वेशभूषा, भावमुद्रा आणि पदलालित्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. तर उत्तर भारतीय कथक नृत्यांगनेने रूपक, एकताल आणि पंचम सवारी या तालांमधील लयकारी, तंत्रकारी व अदाकारी सादर करत रसिकांची भरभरून दाद मिळवली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साकव फाउंडेशनचे डॉ. जगदीश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री जाधव, अजय यंगल, श्रीशैल माने, देवराज पांढरे, रिया चव्हाण, वीर चव्हाण, पौर्णिमा शिवपुंजे आणि जोथम कराळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.





