मृत्युंजय, छावा, युगंधर यासारख्या गाजलेल्या कांदबऱ्यांचे लेखक शिवाजीराव सावंत यांची आज दि. ३१ ऑगस्ट जयंती.
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४० रोजी आजऱ्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. कष्टकऱ्याच्या घरचं वातावरण कसं असणार तसंच त्यांच्या घरी होतं. शालेय जीवनात ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.
लहानपणी सणवार, देव-धर्म यानिमित्तानं आईच्या तोंडून त्यांना पुराणकथा ऐकायला मिळत. या गोष्टींमुळे महाभारतातील घटना, त्यातल्या व्यक्तींविषयीचं त्यांचं कुतूहल वाढीस लागलं. गावातले सण-समारंभ, कथा-कीर्तनं, प्रवचनं, भजनं, नाटकं यांत लहानगा शिवाजी रमत होता. त्याला ते आवडत होतं. रुचत होतं. मनात अन् कानात साठत होतं. आपल्याला आयुष्यात पुढं काय व्हायचंय, हे त्या लहानशा वयातही त्याला पक्कं ठाऊक होतं. आठवीत असताना ‘माझं ध्येय’ या विषयावरील निबंधात ‘मला लेखक व्हायचंय’ हे त्यानं स्पष्टपणे लिहिलं होतं.
याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक शाळकरी घटना घडली. त्याने त्यांच्यातला लेखक.. ‘मृत्युंजय’कार जागा झाला. हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात शिवाजी आणि त्यांच्या मित्रांनी शि. म. परांजपे लिखित ‘अंगराज कर्ण’ ही एकांकिका सादर करायची ठरवली. या एकांकिकेतील आपल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेचं सगळ्यांकडून कौतुक झालं तरी शिवाजी मनातून अस्वस्थ झाला होता. परांजपेंनी लिहिलेले कर्णाचे संवाद त्याला मुख्य भूमिका असलेल्या श्रीकृष्णाच्या संवादांपेक्षाही बेचन करीत होते. कारण कर्णाचे ते संवाद बिनतोड आणि तर्कशुद्ध होते. लहानग्या शिवाजीच्या काळजात ते घट्ट रुतून बसले. ‘मृत्युंजय’ या त्यांच्या साहित्यकृतीचं बीज त्यांच्याही नकळत अशा प्रकारे त्या शाळकरी वयात रुजू लागलं होतं.
संपूर्ण महाभारताचा वेध घेणारी आणि आजच्या वाचकाला थेट कुरूक्षेत्रावर नेणारी ‘मृत्यूंजय’ ही कादंबरी त्यांनी अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी लिहिली. कर्णाच्या या कथानकाने लोकप्रितेचे सारे बंध ओलांडले. त्या कथेची हिंदी, इंग्रजी, मल्याळम, कन्नड, गुजराथी, बंगाली, तेलुगू, उडिया या भाषांत भाषांतरे झाली. अशी स्थल, काल, भाषेच्या मर्यादा ओलांडून गेलेली ही मराठीतील पहिली कादंबरी! तिला राज्य शासनाच्या पुरस्कारापासून मूर्तिदेवी पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार लाभले. ‘मृत्युंजय’ या कादंबरीनं मराठी साहित्यविश्वातील अनेक विक्रम मोडले. साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी १९९० साली या कादंबरीचं नामांकन झालं होतं, हे फार थोडय़ांना माहीत असेल. त्यानंतर शिवाजीरावांनी लिहिलेल शंभू चरित्राची, ‘छावा’चीही पुरस्कारांनी अशीच पाठराखण केली. पद्मश्री विखे- पाटलांची चरित कहाणी, ‘लढत’,मनोहर कोतवालांचा ‘संघर्ष’, क्रांतिसिंहांची ‘गावरान बोली’, ‘शेलका साज’,‘मोरावळा’,‘अशी मने असे नमुने’, ही त्यांची अन्य ग्रंथसंपदा. मराठी मनावर गारूड करून राहिलेल्या शिवाजीरावांच्या भाषेची मोहिनी आजही अबाधित आहे. ‘युगंधर’ ही श्रीकृष्णावरची त्यांची कादंबरी.
पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले. शिवाजी सावंत हे १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३ मध्ये बडोदा येथे भरलेल्या “बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे” ते संमेलनाध्यक्ष होते.
मृत्युंजय(१९६७), या पौराणिक कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे. मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांना थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले. . युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थित कन्या कादंबिनी यांनी केला आहे. मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कऱ्हाड येथे भरणाऱ्या ७६व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे दि. १८ सप्टेंबर २००२ ला वयाच्या ६२ व्या वर्षी शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
– योगेश शुक्ल







