‘अटरली बटरली डिलिशियस’ असे म्हणत संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केलेल्या अमुल उद्योगाची निर्मिती कुरियन वर्गिस यांनी केली. या प्रकारे देशातल्या दुग्धक्रांतीचे ते जनक ठरले. 9 सप्टेंबर त्यांचा स्मृतिदिन.
‘दुधाची टंचाई असलेला देश’ ही भारताची ओळख पुसून या देशात ‘दुधाचा महापूर’ आणणारे धवलक्रांतीचे जनक ‘भारताचे मिल्कमॅन’ अशी ओळख असणाऱ्या कुरियन यांनी देशातील शेतक-यांना सहकाराच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी आयुष्य वेचले. केरळमधील कोझिकोडे येथे 26 नोव्हेंबर 1921 रोजी जन्मलेल्या कुरियन यांनी चेन्नईमध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यावर मिशिगन विद्यापीठात ‘डेअरी इंजिनीअरिंग’ या विषयासह मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
आणंदला सरदार वल्लभभाई पटेल यांनी एका सहकारी दुग्धोत्पादन संघाची स्थापना केली होती. स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर त्याहीपेक्षा बरंच काही आहे, हे सरदार पटेलांनी ओळखलं होतं. सावकारी पाश, अनिष्ट रुढी आणि वर्ण-जातिभेदाच्या ओझ्यांतून ग्रामीण जनतेची मुक्तता केल्याशिवाय ते खर्या अर्थानं स्वतंत्र होणार नाहीत, याची त्यांना जाणीव होती. शेतकर्यांचे आर्थिक हितसंबंध जपणार्या आणि ग्रामीण जनतेच्या गरजा भागवणार्या ग्रामपातळीवरच्या संशोधन तसंच प्रशिक्षण संस्थांची उभारणी केल्यानंच या प्रश्नांना थेट भिडता येईल्, असा सरदार पटेलांचा विश्वास होता. आपल्या उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दूध सहकारी संस्थांची उभारणी करावी, असं सरदार पटेलांनी दूध उत्पादक शेतकर्यांना सांगितलं आणि आणंदला ‘कैरा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघा’ची स्थापना झाली. श्री. त्रिभुवनदास पटेल हे या संस्थेचे अध्यक्ष होते.
भारतात परतल्यावर डॉ. कुरियन यांच्यावर संघाची पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आणि जबरदस्त इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी आणंदला जगाच्या नकाशावर पोहोचवलं. अनेक विक्रम त्यांच्या नावावर जमा झाले. ‘म्हशीच्या दुधाची भुकटी होऊच शकत नाही’ असं जगभरातील शास्त्रज्ञांनी ठासून सांगितलं असूनसुद्धा डॉ. कुरियन यांनी हा प्रकल्प आणंदला यशस्वीरित्या राबवला. विदेशी आक्रमणाला थोपवत जगातला सर्वांत मोठा खाद्यान्न व्यवसाय उभा करून ‘अमूल’सारख्या देशातल्या सगळ्यात मोठ्या ब्रँडची निर्मिती केली.
सचोटी, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि देशावरील आत्यंतिक प्रेम या गुणांच्या जोरावर डॉ. कुरियन यांनी गुजरातेतल्या आणि नंतर देशभरातल्या दुग्धोत्पादक शेतकर्यांना स्वयंपूर्ण बनवले. पं. नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांसारख्या नेत्यांचा पाठिंबा व शाबासकी, असंख्य मानमरातब, प्रसिद्धी मिळूनसुद्धा ते कायम ‘शेतकर्यांचे नोकर’ म्हणून काम करत राहिले. त्यांनी देशातल्या सामान्य माणसांची ताकद ओळखली, त्यांना एकत्र आणलं आणि देशाला दूध आणि खाद्यतेल या क्षेत्रांत स्वयंपूर्णता मिळवून दिली. डॉ. कुरियन यांनी निर्माण केलेल्या सहकारी संस्थांचा आपल्या माध्यमातून देशातली लोकशाही तळागाळापर्यंत रुजवण्यामध्ये आणि स्त्रियांच्या सबलीकरणासारखा सामाजिक बदल घडवून आणण्यामागे सिंहाचा वाटा आहे.
कुरियन यांच्या असामान्य कर्तृत्वाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. भारत सरकारने त्यांना पद्मश्री (1965), पद्मभूषण (1966) आणि पद्मविभूषण (1999) या पुरस्काराने गौरवले. त्याचबरोबर त्यांना ‘वर्ल्ड फूड प्राइज’, ‘रॅमन मॅगसेसे’, ‘कार्नेजी-वॉटलर’ जागतिक शांतता पुरस्कार आणि अमेरिकेचा ‘इंटरनॅशनल पर्सन ऑफ द इयर’ हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
मूत्रपिंडांच्या आजारामुळे वर्गीस कुरियन यांना नडियाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. सप्टेंबर ९, इ.स. २०१२ रोजी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
‘अमूल द टेस्ट ऑफ इंडिया’
कुरियन यांनी शेतक-यांना काम देण्याऐवजी त्यांना संघटित केले. नोकरशहा, मंत्री, प्रस्थापित संस्था इत्यादींसोबत शेतक-यांच्या हितासाठी लढा दिला. त्यांनी शेतकऱ्यांना जणू देवच मानले. त्यांच्या प्रेरणेने गुजरातमधील पहिली सहकारी डेअरी संघटना 1946 मध्ये स्थापन झाली. त्यावेळी केवळ दोन गावांतील सहकारी सोसायट्या त्याच्या सदस्य होत्या. आता ही संख्या 16,100 पर्यंत पोहोचली असून 32 लाख सदस्यांकडून दूध संकलित होत आहे. 60च्या दशकात भारताची दूध संकलनाची आकडेवारी 20 एमएमटी (मिलियन मेट्रिक टन) होती. ती 2011 मध्ये 122 एमएमटी झाली. गुणवत्ता आणि उत्तम सेवा यांच्या आधारे कुरियन यांनी अमूलला यशोशिखरावर चढवले. संस्थांची स्थापना व तेथील प्रणालींची रचना यामध्ये डॉ. कुरियन यांचे प्रमुख योगदान होते. त्यांच्या प्रयत्नामुळे अमूल कंपनी ‘टेस्ट ऑफ इंडिया’ बनली.
डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कार्यावर ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी 1976मध्ये ‘मंथन’ या चित्रपटाद्वारे प्रकाश टाकला. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा बेनेगल यांच्यासह कुरियन यांनीही लिहिली होती, तर ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांची पटकथा होती. कुरियन यांच्या ‘आय टू हॅड अ ड्रीम’ या आत्मचरित्राचा सुजाता देशमुख यांनी ‘माझंही एक स्वप्न होतं’ या नावाने अनुवाद केला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, देशात दुधाचा महापूर निर्माण करणारे वर्गिस कुरियन स्वत: मात्र दूध पीत नव्हते. ‘मला दूध आवडत नसल्याने मी ते पीत नाही,’ असे ते सांगत.





