खासदार प्रणिती शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; पंचनामे, टँकर, चारा छावण्या, रोजगार हमी व, सिंचनाच्या पाण्याचे तातडीने नियोजन करण्याची मागणी
सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर तसेच; पशुपालकांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत खरीपाची पिके करपली असून काही ठिकाणी पिकांची उगवणही झालेली नाही. त्यामुळे, केवळ पर्जन्यमानाची आकडेवारी न पाहता जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी खरीप पिकांचे प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, पिकांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता करून द्यावी तसेच; ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे त्याठिकाणी तातडीने टँकर सुरू करावेत अशीदेखील मागणी केली आहे.
जनावरांसाठी चारा छावण्या व चारा डेपो सुरू करून चारा, बियाणे व, आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. यासोबतच खंडित वीजपुरवठ्यामुळे कृषिपंपांना अडचणी येवू नयेत यासाठी शेतकऱ्यांना किमान १० तास वीजपुरवठा मिळावा, पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांशी समन्वय साधावा आणि, शेतमजूर व मजुरांसाठी मनरेगा व रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
तलाव भरण्यासाठी सिंचनाच्या पाण्याचे नियोजन
जिल्ह्यातील उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची मागणीही खासदार शिंदे यांनी केली आहे. एकरुख सिंचन योजनेमार्फत कुरनूर धरण, रामपूर तलाव, हणमगाव तलाव आणि, धुप्पडी तलाव भरून घेण्यासाठी तातडीने नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच; मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी उपलब्ध करून द्यावे व, कृष्णा नदीच्या पाण्याचा योग्य उपयोग केल्यास परिसरातील सुमारे १९ गावांना दिलासा मिळू शकतो असे सदरील निवेदनामध्ये म्हटलेले आहे.
कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी
ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने क्लाऊड सीडिंग अर्थात; कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबवावा अशी मागणीही करण्यात आली आहे. यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील केगांव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमधील उपलब्ध यंत्रणेचा वापर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
उजनी धरणासह सर्व जलसाठ्यांचे योग्य नियोजन करावे
उजनी धरणासह जिल्ह्यातील सर्व उपलब्ध जलसाठ्यांचे नियोजन करून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. भिमा, वीर-भाटघर आणि, निरा नदीच्या कालव्यांमधील पाण्याचा योग्य वापर करून – तलाव, बंधारे व, जलसाठे भरून घ्यावेत. तसेच, उजनी कालव्यातून माण नदीत पाणी सोडून माण नदीवरील बंधारे व जलसाठे भरून घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी याठिकाणी केली आहे.
“सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असून प्रशासनाने केवळ आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात” अशी अपेक्षा खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.






